भोसरी : कंगना राणावतने महाराष्ट्रात राहून मुंबाईला पाकव्याप्त काश्मीर संबोधून महाराष्ट्राची बदनामी केली आहे. मुंबईतील शिवसैनिक कंगनाला मुंबई विमावतळावर पाऊल ठेऊ देणार नाहीत. मात्र, कंगना पुण्यातील लोहगाव विमानतळावर आल्यास तिचा चांगलाचा समाचार घेऊ असा इशारा शिवसेनेच्या महिला आघाडी पुणे जिल्हा प्रमुख सुलभा उबाळे यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या शिरुर लोकसभा आणि भोसरी विधानसभा संघाच्यावतीने सिनेअभिनेत्री कंगना राणावतच्या कथित वक्तव्याचा निषेधार्थ भोसरीतील माजी खासदार शिवाजीराव आढळरावपाटील यांच्या संपर्क कार्यालयजवळ जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके म्हणाले, "ज्या महाराष्ट्राने कंगनाला जगवले त्या महाराष्ट्रातील पोलिसाविषयी कंगना राणावतने घेतलेला संशय निषेधार्ह आहे." भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट म्हणाले, "कंगना राणावतने महाराष्ट्राबद्दल कोणतेही अपमानास्पद केलेले वक्तव्य शिवसेना खपवून घेणार नाही. कंगनाने कथित वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे."
या प्रसंगी पुणे जिल्हा युवा सेना समन्वयक सचिन सानप, राहुल भोसले, उपशहर प्रमुख अनिल देवकर, अमित शिंदे, रावसाहेब थोरात, सतिश मरळ, विश्वनाथ टेमगिरे, नितीन बोंडे, प्रवीण पाटील, विश्वास शिर्के आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी राजू भुजबळ, दीपक साळुंखे, प्रदीप सपकाळ, प्रदीप चव्हाण, सुखदेव देवकर, सहदेव चव्हाण, अनंत हिंगे आदींनीही निषेध केला.