चंद्रपूर

पंकजा मुंडेंवर खरोखरच अन्याय होतोय?, वाचा, काँग्रेसच्या बड्या नेत्यांना काय वाटतं?

राजेश पाटील 385   13-07-2021 02:16:09

मुंबई: भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थक नाराज आहेत. या नाराजीतूनच पंकजा समर्थकांनी पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. या निमित्ताने मुंडे भगिंनींवर भाजपमध्ये अन्याय होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीही हवा दिली आहे. (is pankaja munde unhappy in bjp?, know what congress leader says)

काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंकजा मुंडेंसारख्या नेत्यावर भाजपमध्ये अन्याय होतोय हे खरे आहे.

भाजप नेतृत्वाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं थोरात यांनी सांगितलं.

 

पंकजांवर अन्याय होतोय हे खरं आहे

 

तर, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही थोरात यांच्या सुरात सूर मिसळला. पंकजा मुंडे यांच्यासारखे नेत्यांवर अन्याय होतो हे खरंच आहे. पंकजा या मराठावाड्यातील नेत्या आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण राज्यात भाजपला वाढवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे भाजपनं त्यांची दखल घ्यायला हवी होती. पण हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असं चव्हाण यांनी सांगितलं.

 

भाजपकडून बातम्यांची पेरणी

 

भाजपमध्ये पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याचं हे दोन्ही नेते सांगत असले तरी आघाडीत मात्र सारं काही अलबेल असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माध्यमांमध्ये काँग्रेसमध्ये वाद असल्याचं दाखवलं जात आहे. पण आमच्यात असा कुठला वाद नाही. नाना पटोले यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेस महागाई विरोधात आंदोलन करून भाजपला जेरीस आणत आहे. त्यामुळे भाजपमधून अशा बातम्या पेरल्या जात आहेत. महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. पण महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही, असं थोरात यांनी सांगितलं. तर, महाविकास आघाडीत कुठलाही बेबनाव नाही. फक्त बाहेर चित्रं रंगवलं जात आहे. नाना पटोले यांनी मांडलेली भूमिका ही पक्षाशी संबंधित आहे. त्यावर त्यांनी खुलासा केला आहे. त्यामुळे वाद असण्याचं कारण नाही, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

 

तीन दिवस राजीनामा सत्र

 

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. मागील तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात 14 जिल्हा परिषद सदस्य, 35 पंचायत समिती सदस्य, 40 नगरसेवक, 16 बाजार समिती सदस्य, बीड जिल्ह्यातील भाजपचे 11 मंडळ अध्यक्ष या शिवाय शिरूर पंचायत समिती उपसभापतींसह केज, पाटोदा आणि गेवराई येथील पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या पदांचे राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. (is pankaja munde unhappy in bjp?, know what congress leader says)



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.