अहमदनगर

संतोष देशमुखांचे कुटुंब भगवान गडावर जाणार; नामदेवशास्त्रींना सगळे पुरावे देणार, न्याय मागणार

नितीन देशपांडे 92   31-01-2025 21:56:31

पुणे:: 

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत.

दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. यानंतर आता मृत संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवान गडावर जाणार आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी सांगितले की, बाबा म्हणाले की, या हत्येतील जे आरोपी आहेत, त्या आरोपीची मानसिकता खराब झाली. पण ही सगळी अपुरी माहिती आहे. त्यांच्याकडे सगळी माहिती नसल्यामुळे ते असे म्हणाले. खरी माहिती अशी आहे की, मस्साजोग येथील अवादाच्या प्लांटवर खंडणीसाठी ते सगळे आरोपी आले होते. त्यांनी आमच्या गावातील दलित बांधवाला मारहाण केली. काठ्यांनी मारले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे. हा पुरावा त्यांना दाखवणार आहोत, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तुम्ही म्हणाला असता की स्वतःला शिक्षा करून घ्या, तर तेही आम्ही केले असते. आरोपीबाबत अतिशय चुकीच्या पद्धतीने गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. योग्य माहिती आमच्याकडे आहे. आम्ही येत्या रविवारी भगवान गडावर महंत नामदेवशास्त्री यांची भेट घेणार आहोत. सगळे पुरावे घेऊन जाणार आहोत. त्यांच्यासमोर ठेवणार आहोत आणि त्यांच्याकडे न्याय मागणार आहोत, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.