राष्ट्रीय

सिडको’चे हक्काचे घर मिळालेले भाग्यशाली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शरद लाटे 5   20-02-2025 11:08:16

पुणे (Pcmctahalka.in):: मुंबई: सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यांसारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पवित्र दिनी २१ हजार ३९९ नागरिकांना सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत आहे. ही हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असून त्यांच्या अभिनंदनाची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, सिडकोचे अधिकारी तसेच लॉटरीतील सहभागी नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून यात नागरिकांना आपली पसंद नोंदविण्याची मुभा फक्त सिडकोने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिडकोची ही घरे टाटा, एल.एण्ड टी., शापूरजी यांच्या सहभागाने बांधली असल्याने ती अतिशय  दर्जेदार असून ही घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे. नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.पूर्वी नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, आता अटल सेतूमुळे 20 मिनिटात प्रवास होतो. आता ठाणे ते विमानतळ एक डेडीकेटेड कॉरिडोर करण्यात येणार असून त्याचबरोबर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी या अर्थसंकल्पात देशात तीन कोटी घरे देण्याचे जाहीर केले असल्याने महाराष्ट्रात 20 ते 25 लाख घरे नक्की बांधली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.एमटीएचएल प्रकल्पाबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काही एनजीओ, पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पास विरोध दर्शवून या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईतून कमी होतील, असे सांगितले होते. मात्र, त्यावेळी रिमुव्हर्स सर्कुलेशन ड्रेन, नॉईस बॅरिअर या तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे एमटीएचएल प्रकल्पामुळे फ्लेमिंगोची संख्या कमी न होता आणखी वाढली. यावरून हे शासन प्रो इन्व्हायरमेंट प्रकल्प करते आहे, हे दिसून आले. आता नवीन गृहनिर्माण धोरण आणले जात असून यात सर्वांसाठी परवडणारी घरे, परवडणारी भाड्याची घरे, विद्यार्थी वसतीगृहे, काम करणाऱ्या महिलांसाठी घरे, ज्येष्ठ नागरिकांना घरे, गिरणी कामगार, डबेवाले आदींचा अंतर्भाव असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.



आपल्या भागांतील बातम्यासाठी कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा



तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.